बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार सीमा दाभर्डे पोलिसांच्या जाळ्यात.


चंद्रपूर :-शहरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली युवती सीमा दाभार्डे ही पोलिसांना गुंगारा देत तब्बल तीन महिन्यापासून फरार होती मात्र तीला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला गती येणार असून हत्येच्या कारणाचाही खुलासा होणार आहे.

बंगाली कॅम्प परिसरात काँग्रेस नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज अधिकारी यांची २९ सप्टेंबर रोजी दाताळा येथील सिनर्जी वल्डमध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये कु-हाडीने वार करून हत्या करण्यात आली होती. रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. या प्रकरणात मनपातील अपक्ष नगरसेवक अजय सरकारसह देवनाथ आणि रवी बैरागी या तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, घटनेची मुख्य सूत्रधार असलेली सीमा दाभार्डे ही युवती घटनेच्या दिवसापासून फरार होती. तिच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले होते. मात्र, प्रत्येकवेळी ती पोलीस पथकाला गुंगारा देत होती. उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी तिने अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला होती. जामीन मिळविण्याचे सर्वच प्रयत्न फसल्यानंतर ती चंद्रपुरात घरी परतणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारे तिच्या घराजवळ पोलिसांनी सापळ्या रचला. ती घरी पोहोचताच पोलिसांनी तिला घरूनच अटक केली. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता २६ डिसेंबरपर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मनोज अधिकारी हत्याकांडात सीमा दाभर्डे ही मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. तिच्या माध्यमातुनच हे हत्याकांड घडवून आणल्याची चर्चा असल्याने तिच्या अटकेमुळे या हत्याकांडातील गुंता सुटण्यास मदत होणार असून, हत्येचे मूळ कारण उजेडात येणार आहे. त्यामुळे तिच्या चौकशीत काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीमाच्या अटकेमुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.