▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

Wadettiwar जिल्ह्याच्या चेक पोस्ट वरून विनापरवानगी कुणालाही जिल्ह्यात सोडू नका:-ना.विजय वडेट्टीवार

जिल्ह्याच्या चेक पोस्ट वरून विनापरवानगी कुणालाही जिल्ह्यात सोडू नका:-ना.विजय 

Ø जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

Ø गावात येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करा

Ø वैद्यकीय तपासणी इतकीच नाकाबंदी जबाबदारीची

Ø अन्नधान्य वाटपामध्ये जिल्ह्यात समाधानकारक काम

Ø शेल्टर होममधील नागरिकांनी दूरध्वनी संवाद साधावा

Ø अन्य ठिकाणच्या जिल्हावासियांनी जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करू नये

Ø शेतीच्या सर्व कामांना शारीरिक अंतर ठेवून सुरू ठेवा

Ø अजान देतांना मशिदीमध्ये 5 पेक्षा अधिक व्यक्ती नको

Ø केशरी कार्ड धारकांनी धान्याची उचल तत्पर करावी

Ø लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम असून बाहेर पडू नये

Ø विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे


 चंद्रपूर, दि.27 एप्रिल : जिल्ह्यात, शहरात, गावाच्या कोणत्याही भागात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद होत आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणी एवढी नाका-बंदी देखील महत्त्वाची आहे. पोलिसांना हे काम अतिशय कठीण व 24 तास करावे लागत आहे. मात्र हा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यासाठी पोलीस विभागाने विनापरवाना कोणालाही जिल्हयात घेऊ नये, असे सक्त निर्देश आज राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

कृषी विभागाच्या मर्यादित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत त्यांनी जिल्ह्यातील कोरोना संक्रमणासंदर्भात सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. नागपूर, यवतमाळ या 2 लगतच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने थैमान घातले असून या परिस्थितीत जिल्हा कोरोनामुक्त ठेवणे अतिशय जिकिरीचे, जबाबदारीचे आणि कर्तव्यदक्षतेचे काम आहे.ज्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी जीव धोक्यात घालून तपासणी करत आहेत. त्याच पद्धतीने नाका-बंदी देखील केली जात आहे. मात्र ही प्रक्रिया पुढील काही दिवस अतिशय जिकरीने करणे गरजेचे आहे, तेव्हा पोलिस विभागाने राज्य जिल्हा सीमांवर विनापरवाना कोणालाही आत घेऊ नये, असे निर्देश त्यांनी आज दिले.

अन्य जिल्ह्यातील नागरिकांची आवश्यक ती काळजी शेल्टर होममध्ये घेतली जात आहे. आपल्या जिल्ह्यातील बाहेर अडकून पडलेल्या हजारो चंद्रपूरवासियांची काळजी अन्य जिल्ह्यात अन्य राज्यात घेतली जात आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत जो जिथे आहे त्यांनी तिथेच राहणे आवश्यक आहे. घरापर्यंत पोहोचण्याशिवाय अन्य काही अडचण असल्यास त्यामध्ये निश्चित मदत केली जाईल. तोडगा काढला जाईल, असे देखील त्यांनी आज स्पष्ट केले.

जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. आराधना आणि आणि दान करण्याचा हा महिना असून जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पडून सण साजरा करावा. घोळक्याने जमा होणे,घराबाहेर पडणे किंवा मशिदीमध्ये गोळा होणे धोकादायक आहे. मशिदीमध्ये अजान देताना केवळ 3 ते 5 नागरिक हजर राहतील, शारीरिक अंतर ठेवून धार्मिक विधी पार पडतील, प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळतील अशी विनंतीही त्यांनी नागरिकांना केली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आज खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली असून शेतकऱ्यांनी शेतातील सर्व कामे शारीरिक दूरी ठेवत पूर्ण करावी. हंगाम सुरू करण्यास आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट केले.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभ योजनेअंतर्गत नियमित अन्नधान्य वाटप 99 टक्के पूर्ण झाले आहे. तर वरील योजनेतील नागरिकांना प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ वाटपाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे.या सर्व नागरिकांना एप्रिल महिन्याचे अन्नधान्य वाटप पूर्ण झाले आहे.केशरी कार्ड धारकांनी धान्याची उचल तत्पर करावी.

दरम्यान, 27 एप्रिल रोजी कोरोना संसर्ग संशयित म्हणून 101 नागरिकांची नोंद करण्यात आली असून यातील 93 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 83 नमुने निगेटिव्ह निघाले आहेत तर 10 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत विदेशातून, राज्याबाहेरून व जिल्हा बाहेरून आलेल्या नागरिकांची संख्या 33 हजार 245 आहे. यापैकी 2 हजार 697 नागरिक निगराणीखाली आहेत. तर 14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईन पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या 30 हजार 548 आहे. जिल्ह्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 122 आहे.