गडचांदूरातील देशी दारू दुकाने शहराबाहेर हलणार?



चंद्रपूर (वि.प्र.) चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यामधील गडचांदूर शहरात भर वस्तीमध्ये देशी दारू चे दुकाने लावण्यात आली, भर वस्तीतील या दुकानामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे यासंबंधात निवेदने देण्यात आली होती. त्यावर शासकीय स्तरावर पावले उचलण्यात येत असल्याची माहिती आहे.
सविस्तर माहिती अशी की, औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात देशी दारूची दुकाने सुरू झाली आहेत. अत्यंत वर्दळीच्या व मध्यभागामध्ये ही देशी दारूची दुकाने असल्यामुळे महिला व विद्यार्थीनींना या दारू दुकानांपासून व दारूड्या पासून त्रास होत आहे, गडचांदूर शहरात चार ते पाच देशी दारूची दुकाने असून ही दुकाने शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागात असल्याचे निदर्शनास आले आहे यासंदर्भात यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या असून गडचांदूर शहराच्या वर्दळीच्या भागात असणारी ही देशी दारूची दुकाने शहराबाहेर हलविण्यात यावी, या आशयाचे निवेदन नुकतेच विदर्भ राज्य ग्रामीण शहरी पत्रकार संघाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नागपूर विभागीय उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूर जिल्हा अधीक्षक व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना दिले होते.
अत्यंत वर्दळीच्या असलेल्या अचानक चौक परिसरात गुलाब शेंद्रे यांचे देशी दारू दुकान सुरु झाले असून याच परिसरात पुरातन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दुर्गा मातेचे मंदिर आहे. भाविकांची या मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते तसेच या देशी दारू दुकानाच्या लगतचं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक असल्याने सामान्य शेतकरी, शिक्षक, निराधार, महिला व विद्यार्थ्यांची मोठी ये-जा सुरु असते. अनेकदा या ठिकाणी दारूड्यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांना, बँकेचे ग्राहकांना चिल्लर पैशाकरिता त्रास देणे व महिलांना छेडछाड करणे सुरु केले आहे. परिसरातील रहिवासी बांधवाना व व्यापारी बांधवाना ही या दारू दुकानांचा त्रास होत आहे. तसेच स्टेट बैंक ऑफ इंडिया जवळ रऊफ खान व इतर यांचे देशी दारू दुकान सुरू झाले असून गडचांदूर शहरातील गजबजलेला परिसर असल्याने या परिसरात बँकेत येणारे पुरुष, महिला, विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार ग्राहकवर्ग सदर दारू दुकानामुळे त्रस्त झालेला आहे. बँकेचे परिसरात छेडखाणीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शाळा, कॉलेजसाठी जाण्या-येण्यासाठीचा हा मुख्य रस्ता आहे. तसेच या ठिकाणी आठवडी बाजार सुद्धा भरत असतो. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा असलेल्या या परिसरातील हे देशी दारूचे दुकान नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच शहरातील राजीव गांधी चौक येथे भाऊराव रणदिवे व शहीद बिरसा मुंडा चौक येथे दिगांबर लांजेकर व इतर यांची दुकाने सुरु झाल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.
जेमतेम लोकसंख्या असलेल्या गहचांदुर शहरात शहराच्या मध्यभागी चार ते पाच देशी दारूंची दुकाने आहेत. या देशी दारू दुकानांमुळे व दारूड्या मुळे पुरुष महिला, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या साऱ्या बाबींचा विचार गडचांदुर शहरातील देशी दारू ची दुकाने शहराच्या बाहेर हलविण्यात यावे, जेणेकरून भविष्यात मोठा अपघात किंवा होणाऱ्या हानीला सामोरे जावे लागणार आहे.
गडचांदूर शहरातील या देशी दारू दुकानांना शहराच्या बाहेर ३ कि.मी. हलविण्यात यावे, जनहिताच्या या समस्याची त्वरित सकारात्मक दखल घेण्यात यावी,
या आशयाचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात विदर्भ राज्य ग्रामीण-शहरी पत्रकार संघाच्या माध्यमातुन देण्यात आले होते, यासंदर्भात विविध संघटनांनी सुद्धा निवेदने दिले होते. या निवेदनावर शासन स्तरावर दखल घेण्यात येत असल्याची सुत्रांची माहिती आहे. गडचांदूर शहरातील देशी दारूची दुकाने शहराबाहेर हलविण्याचा शासकीय प्रक्रियेला येणाऱ्या काही दिवसांत सुरूवात होणार असल्याची अधिकृत माहिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारू दुकानांना परवानगी दिल्यानंतर आणि आक्षेपानंतर काही तालुक्यांमध्ये दारू दुकानांना शहरांच्या बाहेर हलविण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाला दिली आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील गडचांदुर शहरातून ही तक्रारी आलेल्या आहेत,
गडचांदूर शहरातील देशी दारू दुकानांना सुद्धा शहराच्या बाहेर हलविण्याच्या प्रक्रियेला प्रशासन स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.