कायदा हातात घेणारा आता सुटणार नाही !नाम.वडेट्टीवार यांचे पोलीसांना निर्देश


  • चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून "हत्यां"चे सत्र आणि अपराधी प्रवृत्ती यामध्ये भयंकर वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अपराधी प्रवृत्तीच्या मानसिकतेने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. यासंदर्भात नुकतेच गुरूवार दि. 1 ऑक्टोंबर रोजी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात गुंड प्रवृत्तींना ठोकून काढा असे निर्देश पोलीस अधीक्षकांना देणार असल्याचे सांगून ज्यांचेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशांवर त्वरित कारवाई करा. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्यांवर, तो कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे, त्यांना ती कितीही मोठे असले तरी ठोकून काढण्यात यायला हवे. कायदा हातात घेणारा जिल्ह्यामध्ये सुटणार नाही. असे निर्देश पोलिस अधीक्षकांना देण्यात येणार असल्याचे पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात पालकमंत्र्यांनी सांगितले. गुन्हेगारी प्रवृत्तीचा कोणीही आता जिल्ह्यात सुटणार नाही. जो गुन्हेगार आहे त्यांना उचला व त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये नाम. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

    मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये घडलेल्या अपराधिक घटना ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. अपराधी प्रवृत्तीच्या मानसिकतेने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात डोके वर काढले असून चंद्रपूर जिल्हा हा अत्यंत शांतप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जात होता परंतु त्यावर आता प्रश्नचिन्ह उभा राहणार, असेचं चित्र दिसत आहे. यासंदर्भात पत्रकारांनी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री व अन्य आमदारांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर पालकमंत्र्यांनी आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली.

"ती" साखळी तोडणे महत्त्वाचे !
चंद्रपूर जिल्ह्यात रेती-कोळसा व दारू तस्करांचे विस्तारलेले जाळे व तस्करांना असलेले राजकीय (?) वलय यातून गुन्हेगारी जगतात वाढ झाली, हे नाकारता येत नाही. पोलीस विभागातील काही "भ्रष्ट अधिकारी" व राजकारणातील काही "नतद्रष्ट" यांच्यासोबत असलेले तस्करांचे संबंध, त्यांची निर्माण झालेली साखळी तोडणे हे पोलीस विभागाला मोठे आवाहन आहे. अनेक काळेधंदे करणारे गुन्हेगार जिल्ह्यात पांढरपेशा आयुष्य जगत आहे. नेत्यांच्या जन्मदिनानिमित्त व विविध कार्यक्रमात त्यांचे झळकणारे शुभेच्छा बॅनर पक्षाची प्रतिमा तर मलीन करूनच राहिले व अपराध्यांना पाठीशी घालत आहे. त्या-त्या पक्षाला या अशा प्रवृत्तीपासून पक्ष वाढविण्यास कधीही सहकार्य होणार नाही. उलट त्यांच्या पक्षाचे यातून या प्रवृत्ती नुकसान करीत आहे व जिल्ह्यात अपराधी प्रवृत्तीला बळ देत आहे, हे प्रत्येक पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी आज तरी समजणे गरजेचे आहे. अशा फाटक्या व स्वयंभू नेत्यांवर पक्षाच्या वरिष्ठांनी लक्ष द्यायला हवे. सोबतच पोलिस विभागाने अशांच्या "लचक्या" सर्वप्रथम तोडणे गरजेचे आहे, तेव्हाचं ही साखळी तुटेल. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील.