बाबुपेठ मध्ये डेंग्यूचे थैमान, महानगरपालिकेचे दुर्लक्ष



चंद्रपूर:-बाबुपेठ प्रभागातील संबोधिनगर गौरीतलाव, एजन्सी प्लॉट, किरमे प्लॉट येथे डेंग्यू आजाराने थैमान घातले असून नागरिक करोना संसर्ग भीतीने सरकारी रुग्णालयात न जाता, शहरातील अनेक खाजगी दवाखान्यात येथील डेंग्यू रुग्ण डेंग्यू उपचार घेत आहेत.एका व्यक्तीचे डेंग्यू मुळे मृत्यू झाले आहे.मात्र महानगरपालिका प्रशासन सुस्त असल्याने करोना पाठोपाठ आता डेंग्यू मुळे नागरिक भयभीत झाले आहेत.संबोधिनगर परिसरात नाल्या व रस्ते नाहीत, त्याकरिता नागरिकांनी वारंवार निवेदने दिलीत परंतू प्राथमिक गरज असलेल्या पक्क्या नाल्या बांधकामाकडे मनपा दुर्लक्ष करीत आहे.चार वर्षांपासून कच्ची नाली काढली आहे परंतु मनपा कर्मचाऱ्या कडून स्वच्छता होत नाही त्यामुळे थोड्या पावसाने पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. रस्ते नसल्याने रस्त्यावरील खड्ड्यात बाराही महिने पाणी साचून डासांची निर्मिती होत असते.नाल्या नसल्याने फक्त नाल्या शेजारून स्वच्छता करणारे स्वच्छता कर्मचारी या परिसरात स्वच्छता करीत नाहीत व रस्त्यावरील गवत कचरा काढत नाहीत.पक्का रस्ता नसल्याने धुराची गाडी येत नाही व फवारणी करीत नाही.त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून, डेंग्यू मलेरिया यांचे प्रमाण वाढत आहे.संबोधिनगर येथे एकमेव सार्वजनिक हापसी बोरवेल असून त्याबोर जवळ अर्धवट नाली असल्याने तीस घरांचे वाहत येणारे सांडपाणी बोरमध्ये मुरत असते.त्यामुळे विषाणूजन्य आजाराचा धोखाही वाढलेला आहे.
त्यामुळे आता फैलाव झालेल्या डेंग्यू , मलेरिया नियंत्रणासाठी योग्य ती कार्यवाही करून नियमित फवारणी करावी,स्वच्छता मोहीम राबवावी, रक्ताचे नमुने तपासावे व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी श्री जुनघरे ते श्री रत्नावार व श्री वनवासू रामटेके ते दुवावार या पक्क्या नाल्या करून साचून राहत असलेल्या नाल्या वाहते करण्याची मागणी स्वच्छता अभियानात पारितोषिक मिळविलेल्या महानगरपालिका कडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.