▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

चंद्रपूर जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

चंद्रपूर जिल्हा कोरोना मुक्त ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन         चंद्रपूर प्रतिनिधी:-                                                                                          
प्रशासनाचे अभिनंदन ; मात्र पुढे एकाही रुग्णाची घुसखोरी होता कामा नये
जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही; प्रतिक्षेतील 6 अहवाल निगेटीव्ह

Ø  लॉकडाऊन आणखी कडक करण्याचे आवाहन

Ø  आकस्मिक परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Ø  जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मॉकड्रील; अनेक परिसर सील

Ø  जिल्हाभरात कडेकोट नाकेबंदी ;सीमा सील

Ø  14 दिवसांच्या होम कॉरेन्टाईनमध्ये 4 हजार 482 नागरिक

Ø  24 नागरीक इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईनमध्ये

Ø  जिल्ह्यात जिल्हा परिषद स्टडी अॅट होम उपक्रम राबवणार

Ø  विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करणार

चंद्रपूर, दि. 10 एप्रिल : चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व प्रशासन अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे. मात्र पुढील काळामध्ये चंद्रपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी करा. एक,एक जिल्हा कोरोना मुक्त ठेवणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्हा सुद्धा या आजारापासून अलिप्त ठेवा. त्यासाठी कडेकोट लॉकडाऊन करा,असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक घरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक पाहणीचे त्यांनी कौतुक केले. अन्य राज्यांच्या सीमा असताना देखील व आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असताना चंद्रपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण नाही, ही बाब अतिशय समाधानाची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सोबतच जिल्ह्याच्या सीमा आणखी कडक करा. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवा. त्याच्या आरोग्याची तपासणी करूनच त्याला प्रवेश द्या.  पुढील काळात लॉक डाऊन अतिशय कडक पाळा, असे सक्त निर्देश त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गहलोत यांनी दिलेल्या वृत्तानुसार जिल्ह्यामध्ये आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. जिल्ह्यात विदेशातून व अन्य ठिकाणाहून आलेल्या 23 लोकांपैकी 22 नागरिकांचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले आहे. या पैकी पुर्ण नमुने निगेटिव आहेत. आतापर्यंत विदेशातून अन्य राज्यातून व अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची संख्या 26 हजार 663 आहे. यापैकी 4 हजार 482 नागरिकांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत 22 हजार 181 नागरिकांनी 14 दिवस होम कॉरेन्टाईन राहण्याचा कालावधी पूर्ण केला आहे.

दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी नागपूर येथे मेयोमध्ये 30 मार्च रोजी चंद्रपूर येथील एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, त्याबद्दल काही वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचा खुलासा केला आहे. त्या रुग्णाचा कोरोना संदर्भातील अधिकृत अहवाल निगेटिव्ह आला होता असे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. कोरोना संदर्भात अधिकृत अहवाल हा नागपूर येथील दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातूनच दिल्या जातात. खाजगी अहवाल पॉझिटिव आल्याचे फक्त वृत्त ऐकले आहे. याबाबत कोणीही अधिकृतरीत्या दावा केलेला नाही. ज्या इस्पितळाकडे अशा पद्धतीचा अहवाल आला असल्याचे सांगितले जाते, त्यांनी देखील चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला अशा पद्धतीने कोणताही अहवाल आल्याचे कळविले नाही संपर्क साधलेला नाही. तथापि, खबरदारी म्हणून मृतक रूग्ण ज्या लोकांच्या संपर्कात आला त्या कुटुंबियांचे व संबधीत डॉक्टरांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे,असा खुलासा केला आहे.

जिल्ह्यात आज ग्रामीण भागातही मॉकड्रीलघेण्यात आली.आकस्मिक काळात जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे यावरुन पुढे आले आहे.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पुन्हा रस्त्यावरील गर्दी वाढत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून नागरिकांनी घरीच राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे.सोबतच रस्त्यावर फिरणाऱ्या दुचाकी व कोणतीही अन्य वाहने जप्त केले जातील, असे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन केले असून विनाकारण फिरणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे, निर्देश दिले आहे.

जिल्हा बाहेर अधिकृत परवानगी शिवाय कोणालाही सीमा ओलांडता येणार नाही.कोणालाही आत घेतले जाणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे धाडस संचारबंदीच्या काळामध्ये करू नये,असेही त्यांनी आज स्पष्ट केले आहे.

संचार बंदीच्या पुढील कालावधीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी विद्यार्थ्यांनी घरूनच अभ्यास करावा यासाठी स्टडी अॅट होम उपक्रमाला जिल्ह्यात सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुढील 30दिवसांसाठी यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आगामी काळात याबाबत अधिक खुलासा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नागरिकांनी जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या संपर्क क्रमांकाचा वापर करावा व त्याद्वारे योग्य ती माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व मोबाईल ऑपरेटर यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत एसएमएस'द्वारे संपर्क क्रमांक पोहोचत असून आवश्यक मदतीसाठी या संपर्क क्रमांकांवर मदत घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील आदेशापर्यंत शेल्टर होम मध्येच राहावे. आपल्याला देण्यात येत असलेल्या सुविधा व निवारा व भोजना संदर्भात जिल्हा प्रशासन रोज आढावा घेत असून त्यामध्ये कुठलीही कमतरता जाणवणार नाही ,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना ही त्यांनी विनंती केली आहे की, पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यात येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करू नये. सर्व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून आत मध्ये प्रवेश दिला जाणार नाही व बाहेर देखील जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी आपल्या अवतीभवती कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या  07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा. कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669  या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा तसेचपालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा या टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.