परराज्यातुन आलेल्या मजुरांची जिल्हा सिमेवर विशेष तपासनी


चंद्रपूर, दि.29 मार्च : महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना (कोविड-19) या आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. या आजाराचे रुग्ण सर्वच विभागांमध्ये आढळून आले आहेत. कोरोना (कोविड-19) नियंत्रणाचा एक भाग म्हणून राज्यामध्ये संपुर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. तथापि, महाराष्ट्रातील तसेच काही कारणामुळे परराज्यात गेलेले प्रवासी, स्थलांतरित कामगार, बेघर, इ. राज्यामध्ये परत येत आहेत. त्यातील बरेचसे पायी व मिळेल त्या रस्त्याने येत आहेत. या प्रवाशांकडून कोरोना(कोविड-19) चा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेता विशेष खबरदारी साठी महाराष्ट्र शासनाने सर्व विभागीय आयुक्त,सर्व जिल्हाधिकारी व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिपत्रक काढून याविषयीच्या कार्यवाही संदर्भात सूचना दिल्या आहेत.

अशी असणार आहे कार्यवाही:

राज्यांतील जिल्ह्याच्या सीमेवर किंवा राज्याच्या सीमा भागातील जिल्ह्यांमध्ये जे प्रवासी, स्थलांतरित कामगार, इ. येतील त्यांना वर नमूद केल्यानुसार आहे.त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अलगीकरण (क्वॉरेन्टाईन) मध्ये ठेवण्यात यावे. त्या ठिकाणी त्यांना आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

परराज्यातून आलेले प्रवासी, स्थलांतरित कामगार व बेघर यांना महसुल विभागाने दिलेल्या वास्तव्याच्या ठिकाणी आणल्यानंतर तेथून जवळ असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविण्याच्या सुचना संबंधितांना द्याव्यात.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधोपचार करावे. गरोदर माता,बालके यांची विशेष काळजी घ्यावी.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांना कोरोना(कोविड-19)आजार व या आजाराच्या प्रतिबंधासाठी वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर आरोग्य शिक्षण द्यावे.

प्रवाशांमध्ये ताप (100 च्या पुढे), खोकला-धाप लागणे अशी लक्षण असणारे प्रवाशी असल्यास पुढील तपासणीसाठी त्यांना रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करावे.

जिल्हा रुग्णालयांमध्ये संशयित कोरोना (कोविड-19) कक्षामध्ये या सर्वांना दाखल करावे आणि त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना घ्यावा. चाचणी अहवाल समारात्मक आल्यास त्वरित आयसोलशन कक्षात दाखल करावे. अहवाल नकारात्मक आल्यास महसुल विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार पुढील कार्यवाही करावी.

रुग्णांची चाचणी सकारात्मक आल्यास त्यांच्या सहवासितांची संपूर्ण माहिती घ्यावी व त्यांना स्वतंत्रपणे 14 दिवसांसाठी क्वॉरेन्टाईन मध्ये ठेवावे व लक्षणे आढळून आल्यास पुढील कार्यवाही करावी.

500 पेक्षा जास्त प्रवासी एका ठिकाण असतील तर,तेथे बहुविध आरोग्य सेवक (पुरुष) यांना 24 तास उपलब्ध ठेवण्यात यावे.

प्रवासी, स्थलांतरीत कामगार आणि बेघर यांचेमुळे स्थानिक जनतेमध्ये कोरोना (कोविड-19) आजार पसरु नये यासाठी उपरोक्त नुसार जिल्हा प्रशासन कार्यवाही करणार आहे.