जनता महाविद्यालयाच्या संस्थेच्या कारभाराची एसआयटी चौकशी करा !



चंद्रपूर :-

चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोक जीवतोडे यांनी यांनी संस्थेत स्थानीय शिक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून नियम अटी व बिंदू नियमावलीचा भंग करून शिक्षक, प्राध्यापक व इतर कर्मचारी भरती केली व जवळपास 100 कोटींपेक्षा जास्त रुपयाची शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप करून या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा व संस्था सचिवावर गुन्हा दाखल करा अन्यथा मला प्राणातिक उपोषण करावे लागेल असा इशारा जनता शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा जेष्ठ नागरिक संघांचे माजी अध्यक्ष गोपाळ सातपुते यांनी चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे,


या पत्रकार परिषदेला मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. जेष्ठ नागरिक संघांचे पैका जेणेकर, महादेवरावं पिंपळकर, प्रा. माणिक अंधारे माजी सचिव, डॉ दाभेरे, संभाशिव आगलावे, शरद उरकूडे, देवराव पाटील ठावरी, अरुण एम्पलवार, पंढरीनाथ गौरकार उपाध्यक्ष, माणिकराव गौरकार सचिव, बळीराम चौहान, किशोर रामटेके इत्यादीची उपस्थिती होती.

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर च्या माध्यमातून जनता महाविद्यालय सह एकूण 15 शाळा महाविद्यालय चालवल्या जातात त्या शाळा महाविद्यालयात जवळपास दीड ते दोन हजार शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी काम करतात, मात्र संस्थेचे सचिव डॉ अशोक जीवतोडे हे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर दडपशाही करून स्वतःच्या मर्जीने बेकायदेशीर शिक्षक भरती करून शासनाची कोट्यावधी रुपयांनी फसवणूक करीत असल्याची तक्रार सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळ सातपुते यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांच्याकडे पुराव्यासह केली होती, परंतु त्यावर कुठलीही चौकशी करण्यात आली नाही, 


दरम्यान गोपाळ सातपुते यांच्या तक्रारीची दखल घेऊन आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुनील केदार व आमदार अमर काळे यांनी विधानसभा सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करून चांदा शिक्षण प्रसारक मंडळ सचिव यांच्या बेकायदेशीर शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेत्तर भरतीची चौकशी ची मागणी केली होती, त्यामुळे चौकशी लागली पण स्थानीय शिक्षणाधिकारी यांनी 9 मुद्यापैकी केवळ तीन मुद्याची चौकशी केली व 6 मुद्याची चौकशी केली नाही. 


त्यामुळे परत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना तक्रार देऊन 6 मुद्याच्या चौकशीची मागणी केली व त्यावर चौकशी सुरु आहे, पण शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्या माध्यमातून प्रकरण दडपल्या जात आहे, त्यामुळे येत्या एक ते दीड महिन्यात चौकशी करून कारवाई करा अन्यथा शिक्षण प्रशासनाविरोधात मी प्रानांतिक उपोषण करेन असा इशारा सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळ सातपुते यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारा दिला आहे.

खुण व इतर गुन्ह्यात अटकेत असणाऱ्या शाळेच्या शिक्षकांना स्वेच्छानिवृत्ती व पेन्शन?

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा शिक्षणाधिकारी यांना मैनेज करून काय काय बेकायदेशीर कामे केली जातात याची अनेक उदाहरणे आहेत, त्यापैकी तीन घटनेची चौकशी झाली आहे, 1) जनता वि‌द्यालय, दुर्गापूरच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा चंद्रशेखर चिमुरकर, यांचेवर दि. 13/07/2015 ला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला होता मात्र संस्थाचालक यानी प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांchi स्वेच्छानिवृत्ती दाखवून पेन्शन केस मंजूर केली, 

2)जनता वि‌द्यालय, बल्लारपूर (डेपो शाखा) च्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा पितांबर महेशकर (आत्राम) ह्या खूनाच्या गुन्हयात आरोपी असल्याची व त्यांना कारावास झाल्याची नोंद आहे असे असतांना त्यांची सुद्धा सेवानिवृत्ती दाखवून पेन्शन केस मंजूर करण्यात आली (केस क्र. पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे अपराध क्र. 76/2006 (कलम 302, 201, 34 अन्वये) 

3) जनता विद्यालय, गोंडपिपरी या शाळेचे सहाय्यक शिक्षक रमेश पोहनकर यांच्यावर खुनाचा गुन्हा कलम 302 अन्वये दिनांक 6/6/2009 ला अपराध क्रमांक 179/2009 अन्वये दाखल असतांना त्यांची स्वेच्छा निवृत्ती दाखवून पेन्शन केस तयार केली व या प्रकरणातून लाखों रुपये संस्था सचिव यांनी मिळवले आहे.

शासनाची फसवणूक प्रकरणी संस्थेचं काय आहे प्रकरण?
सेवानिवृत्त मुख्याध्यापक सातपुते
यांनी आपल्या तक्रारीत नमूद एकूण 9 मुद्द्याची चौकशी करावी अशी मगणी करून संस्था सचिव यांनी बेकायदेशीर व नियमाला डावलून शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेत्तर भरती केली व शासनाची 100 कोटीनी फसवणूक केल्याचा तक्रारीत आरोप केला होता, दरम्यान 3 मुद्द्याची चौकशी झाली परंतु 6 मुद्द्याची चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही, यामध्ये 1) सन 2005 पासून अवैधमार्गाने संस्थेअंतर्गत कर्मचाऱ्याऱ्यांची भरती. 2) संस्थेच्या कुटुंबातील व मर्जीतील व्यक्तींनी शाळेमध्ये शालेय कामकाज न करता नियमीत पगार घेणे. 3) जनता विद्यालय घुग्घूस येथील सुवर्ण महोत्सवाच्या नावाखाली पावती बुक छापून पालकांकडून, शिक्षकांकडून व मान्यवरांकडून निधी गोळा करणे, 4) शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर दबावतंत्राचा वापर करून स्वेच्छा निवृत्ती घेण्यास बाध्य करणे, 5) मंडळाअंतर्गत शाळेत बोगस पटसंख्या दाखवून अधिकच्या वर्ग तुकड्या मा. शिक्षणाधिकारी (माध्य) यांच्याकडून संगणमताने मिळवून अवैध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांची भरती करणे. 6) स्व. श्रीहरी बहुउद्देशिय प्रतिष्ठानाकरीता पावती बुक छापून निधी गोळा केल्याबाबतचा हिशोब देणे. मात्र वरील मुद्द्याची चौकशी झाली नसल्याने सेवानिवृत्त मुख्याध्यापक व जेष्ठ नागरीक संघांचे माजी अध्यक्ष गोपाळ सातपुते यांनी दीड महिन्यात कार्यवाही झाली नाही तर उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आरोपात तथ्य नाही... डॉ अशोक जिवतोडे

सेवानिवृत्त मुख्याध्यापक व जेष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष गोपाळ सातपुते यांनी केलेले आरोपात तथ्य नाही.त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून मानहानीचा दावा करण्यात येणार असून आपण सध्या काठमांडू येथे असल्याने आल्या  बरोबर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार असल्याचे चंद्रपूर क्रांती च्या प्रतीनीधीना सांगण्यात आले आहे.