दुष्काळ, अवकाळी, गारपीट, 'मीचांग'मुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्थ




मुंबई, दि. 7: राज्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, 'मीचांग'मुळे शेतकरी उद्धवस्थ झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ केले पाहिजे, अशी मागणी  
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. शेतकरी संकटात असताना देखील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकत नाहीत, मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त असतात, अशा शब्दात श्री. वडेट्टीवार  सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले.

विधानभेत आज स्थगन प्रस्ताव श्री. वडेट्टीवार यांनी मांडला, त्यावेळी ते बोलत होते.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी संकटात होरपळला आहे. कापूस, धान, संत्रा, द्राक्ष,  कांदा , सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आहे. मंत्री बांधावर पाहणी करायला गेले नाहीत. मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त होते. सरकारने या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या पण पंचनामे होत नाहीत. सरकारने दुष्काळ जाहीर करताना दिरंगाई केली होती.


 फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. याच तालुक्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्यानंतर आमच्या सरसकट दुष्काळाच्या मागणीनंतर सरकारने  1 हजार 21 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला. पण दुष्काळ सदृश्य परिस्थिती असा सरकार शब्दप्रयोग करतंय. या 1 हजार  21 महसूल मंडळांना आर्थिक मदत मिळणार नाही. हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.