अंत्योदय व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना प्रतीव्यक्ती ५किलो मोफत तांदूळ वाटप

जिल्ह्यात 67961.15 क्विंटल टन अन्नधान्याचे वाटप : राजेंद्र मिस्कीन

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना

प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदळाचे वाटप सुरू


चंद्रपूर,दि. 6 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन आहे.या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे.जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 6 एप्रिल 2020 या 6 दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील 264581 शिधापत्रिका धारकांना तब्बल 67961.15 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 1546352 आहेत.या लाभार्थ्यांना 1533 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 15 किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड 20 किलो तांदूळ दिला जातो.त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 2 रु किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो.

जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे 34549.39 क्विंटल गहू, 32468.3 क्विंटल तांदूळ, तर 865.52 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु,लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 5407 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई:

जिल्ह्यात या महिन्यात आतापर्यंत 3 दुकानदारांविरुध्द कारवाई करण्यात आली असून 2 दुकानदारांच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत.जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास कारवाई होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी दिली आहे.