▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

चंद्रपूर जिल्ह्यातील कोळशाच्या अफरातफर प्रकरणी सीबीआय चौकशी करा.



चंद्रपूर :-   महाराष्ट्रात सर्वात मोठ्या कोळसा खाणी ह्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर बल्लारपूर व राजुरा ह्या तालुक्यात असून या भागात मोठ्या प्रमाणांत परप्रांतीय कंत्राटदार व ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत आणि यांची कोळसा चोरीत मोठी भूमिका आहे. या भागातून कोळसा हा रेल्वे सायडिंगवरून मध्य प्रदेश गुजरात व महाराष्ट्रातील इतर वीज निर्मिती केंद्रात जातो. खरं तर वेकोली खाणीतून किंव्हा कोल वॉशरिज मधून जाणाऱ्या कोळसा गाड्या ह्या सरळ वीज निर्मिती कंपन्यात जायला हव्या पण  कोळशाची चोरी करण्यासाठी बाकायदा त्या "विमला रेल्वे सायडिंग" ताडाळी व वणी तालुक्यातील राजूर रेल्वे सायडिंग या खाजगी ठिकाणी नेऊन  खाली केल्या जातात, तिथे जाणारा मोठा आकाराचा कोळसा हा अलग काढून ठेवल्या जातो आणि कोळसा चुरी, कोळशाची राख आणि कोल वॉशरिज चा रिजेक्टेड कोळसा टाकून तो कोळशाचा माल वीज निर्मिती केंद्रात पाठवला जातो, ज्यामध्ये दररोज हजारो टन कोळशाची चोरी केल्या जाते. यासाठी सर्वच वीज निर्मिती कंपन्याच्या अधिकारी यांनी ट्रान्सपोर्ट कंपन्यांना टेंडर देतांना अट ठेवली की आम्ह्च्या वीज निर्मिती केंद्रात कोळसा आणताना तो चंद्रपूर तालुक्यातील विमला रेल्वे सायडिंग व वणी तालुक्यातील राजूर रेल्वे सायडिंग वरूनच आणावा आणि  जर सरळ कोळसा वाहतूक वीज निर्मिती केंद्रात केली तर त्यासाठी विमला रेल्वे सायडिंग व वणी राजूर रेल्वे सायडिंग मैनेजर ची ना हरकत (एनोसी) आणायची, इथे एक गोष्ट प्रामुख्याने नोंद घेण्यासारखी आहे की सरकारी कामात खाजगी कोळसा सायडिंग कडून ना हरकत घेण्याचे कारण काय? याचा अर्थ ह्या दोन्ही खाजगी रेल्वे सायडिंग मधे वीज निर्मिती केंद्राचे अधिकारी व कोळसा व्यापारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात कोळशाची अफरातफर होतं आहे हे शीद्ध होते. या वीज निर्मिती केंद्राच्या आदेशाविरोधात बालाजी वेंचर प्रा. लि. कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून त्याची 11 जानेवारीला सुनावणी आहे. त्यामुळे कोळशाच्या या अफरातफर प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.


पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की कोळशाच्या या काळ्या धंद्यात प्रशीद्ध उद्दोगपती विकास कुमार उर्फ वीक्की जैन (ज्याचे लग्न प्रशीद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे सोबत झाले)  असून त्यांच्या महावीर कोल वॉशरिज या  कंपनीला मध्यप्रदेश पॉवर जनरेशन लिमिटेड या पॉवर प्लांट ला 4.00 लाख टन कोळसा पुरवठा करण्याचे टेंडर मिळाले आहे. यामधे त्यांनी इस्टिमेट च्या जवळपास 50 टक्के कमी दराने टेंडर घेतले जेंव्हा की डिझेल चे  भाव वाढल्याने ट्रान्सपोर्टचे दर वाढले आहे.पण कोळशाचे वाढलेले दर बघता व खाजगी कोळसा रेल्वे सायडिंग वरून कोळशाची दररोज अफरातफर होतं असल्याने वीक्की जैन च्या कंपनीला मोठ्या प्रमाणात नफा होतं आहे. खरं तर सरकारी वेकोली कंपनीच्या स्वताच्या रेल्वे सायडिंग खाली आहेत आणि खाजगी असणाऱ्या विमला व वणी तालुक्यातील राजूर रेल्वे सायडिंग वरून कोळसा वाहतूक होतं आहे. यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होतं आहे, महत्वाची बाब म्हणजे वेकोली खाणीतून व कोल वॉशरिज मधून निघालेला उच्च दर्जाचा कोळसा हा खाजगी रेल्वे सायडिंग वर जातोच शिवाय चंद्रपूर घूग्घूस व वणी ।परिसरातील खाजगी कोळसा डेपोवर काही गाड्यातील कोळसा उतरवून मग तो खुल्या बाजारात चढ्या भावाने विकला जातो. या कोळसा डेपो वरून अनेक वेळा चोरीचा कोळसा पकडल्या गेला व हे कोळसा डेपो बंद करण्याचे आदेश सुद्धा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. मात्र कोळसा डेपो चालविणाऱ्याच्या पाठीवर राजकीय वरदहस्त असल्याने ते बेकायदेशीर डेपो अविरतपणे सुरू आहे.

चंद्रपूर शहराला लागून असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात  जवळपास 2,900 मेगावॉट वीज निर्मिती होते आणि सरकारी असणाऱ्या या वीज निर्मिती केंद्रात मोठ्या प्रमाणात कोळसा आवश्यक असल्याने इथे पण कोळशाची मोठी काळाबाजारी होते, चांगल्या प्रतीचा कोळसा विकत घेण्याच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचा व वेस्टेज कोळसा इथे पुरवला जातो, यामधे येथील मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी यांचे संगनमत असते. 

वेकोलीच्या पैनगंगा,जुनाड,नागलोन  खाणीतून राजूर रेल्वे सायडिंग वरून मध्यप्रदेश वीज निर्मिती केंद्रात वीक्की जैन यांच्या महावीर कोल वॉशरिज च्या माध्यमातून जाणाऱ्या कोळशात कोल वॉशरिज चा रिजेक्टेड कोळसा पाठवला जात आहे. मध्यप्रदेश पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड व महाजनकोला दिला जाणारा कोळसा हा मशीनने बारीक करून पाठवला जाण्याची तरतूद आहे मात्र तसे न करता मोठे ढेले असलेला कोळसा गाड्यांमधे भरून तो कोळसा डेपो मधे उतरवून जवळपास तीन ते चार पटीने चढ्या भावात खुल्या बाजारात तो कोळसा विकल्या जातो व वीज निर्मिती केंद्रात पाठवला जाणाऱ्या कोळशात फ्लायऍस(राख) व कोल वॉशरिज चा रिजेक्ट कोळसा मिसळला जातो ज्यापासून कोळसा व्यापारी व ट्रान्सपोर्ट कंपन्या दररोज कोट्यावधी रुपयाची कमाई करून सरकारी संपतीची लूट करत आहे. यामधे वेकोली अधिकारी व कोळसा व्यापारी यांची मोठी कमिशनखोरी असते.

कोळसा ही राष्ट्रीय संपती असून त्यांची खुलेआम अशा प्रकारे वेकोली अधिकारी, सरकारी वीज निर्मिती केंद्राचे अधिकारी, कोल वॉशरिज चे अधिकारी व कोळसा व्यापारी चोरी करत असतांना देशाचे जागृत नागरिक म्हणून व आपल्या सारख्या दूरद्रुष्टी असणाऱ्या नेत्यांचा सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिक म्हणून माझी जबाबदारी आहे की राष्ट्रीय संपतीची चोरी होऊ नये, त्याकरिता सीबीआय चौकशी करणे गरजेचे आहे, त्यामुळे राष्ट्रीय हितासाठी आपण केंद्र सरकारला या कोळशाच्या अफरातफर आणि चोरी प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करावी अशी मागणी राजू कुकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. याप्रसंगी मनसे शहर संघटक मनोज तांबेकर, मनसे जनहित कक्ष विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुनील गुडे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश काळबांधे, शहर अध्यक्ष विजय तूर्क्याल मनविसे शहर उपाध्यक्ष पियुष धूपे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.