महाराष्‍ट्रात कोणी सरकार देता का सरकार अशी परिस्थिती – आ. सुधीर मुनगंटीवार



हे आंदोलन सर्वसामान्‍य जनतेच्‍या प्रश्‍नांकडे राज्‍य सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी आहे. रस्‍त्‍यावर उतरून, सोशल डिस्‍टसिंग चे उल्‍लंघन करून आम्‍ही आंदोलन करत नसुन प्रतिकात्‍मक पध्‍दतीने हे आंदोलन आम्‍ही करित आहोत. या दोन तिन महिन्‍यात सर्वसामान्‍य जनतेच्‍या हिताच्‍या अनेक मागण्‍या आम्‍ही केल्‍या. परंतु सरकारने मागण्‍यांकडे दुर्लक्ष केले आहे. पोलीस, नर्सेस, सफाई कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या व ईतर कोरोना योध्‍दयांना विमा संरक्षण कवच मिळावे, शेतक-यांना मदत मिळावी अशा विविध मागण्‍या आम्‍ही सरकारकडे केल्‍या मात्र सरकार याकडे डोळेझाक करित आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्‍या ऐवजी वाढतच आहे. ही बाब दुर्देवी आहे. सरकारचे या मागण्‍यांकडे लक्ष वेधावे हाच या आंदोलनामागील हेतु आहे. महाराष्‍ट्रात कोणी सरकार देता का सरकार अशी परिस्थिती असल्‍याची टिका माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

आज चंद्रपूरातील गिरनार चौकातील भाजपा जनसंपर्क कार्यालयासमोर माझे आंगण माझे रणांगण या मोहीमेअंतर्गत महाराष्‍ट्र बचाओ आंदोलनात ते बोलत होते. यावेळी सोशल डिस्‍टसिंग पाळत पाच पदाधिका-यांसमवेत आ. मुनगंटीवार यांनी राज्‍य सरकारच्‍या निषेधाचे फलक दाखवत आंदोलन केले. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, वसंत देशमुख, संदीप आवारी, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.