चंद्रपूर, दि. २७ : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रिया दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मार्फत शासनाची अभिकर्ता संस्था म्हणून राबविण्यात येणार आहे. मात्र, पणन हंगाम २०२५-२६ मधील धान खरेदीसंदर्भातील शासननिर्णय अद्याप प्रसिद्ध न झाल्याने खरेदी प्रक्रिया सुरू होण्यात विलंब झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात पिकविलेले साधारण धान कोणत्याही व्यापाऱ्यास किंवा इतरत्र कवडीमोल दराने विकू नये. शासनाकडून निश्चित करण्यात आलेल्या आधारभूत दरावरच विक्री करावी.
ज्यांच्या शेतातील धानाची कापणी पूर्ण झालेली आहे, त्यांनी शासनाचा आदेश येईपर्यंत धान साठवून ठेवावा, नीट वाळवणी आणि ओलावा कमी करून विक्रीयोग्य स्वरूपात जपणूक करावी. शासनाचे आदेश प्राप्त होताच जिल्हास्तरावर धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे यांनी कळविले आहे.
००००००
