कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी संशयित व्यक्तीची माहिती कळवा ना.विजय वडेट्टीवार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित व्यक्तींची माहिती त्वरित कळवा : ना.विजय वडेट्टीवार


चंद्रपूर,दि.6 एप्रिल : जगासह देशाला विळखा घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित कळवावी, नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांच पालन करावे, असे आवाहन राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले.

चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आला नसला तरी कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यास त्वरित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधा. अशा नागरिकांनी घाबरून जाऊ नये, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी त्यांनी स्वत:हून पुढे यावे तसे केले तर या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल असे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार म्हणाले. आम्ही तुमच्यासाठी घराबाहेर आहोत पण तुम्ही घरातच थांबा असा भावूक संदेश गेल्या कित्येक दिवसांपासून डॉक्टर व पोलिसांकडून देण्यात येतोय. पण अजूनही काहींना करोनाचे संकट किती गंभीर आहे याची जाणीव नाहीये. रस्त्यावरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली असली तरी अजूनही काही नागरिक बेपर्वाईने वागताना दिसत आहेत. राज्यात दिसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूंची संख्याही वाढत आहे हि चिंतेची बाब असून आता तरी जबाबदारीने वागा असं आवाहन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना (5 एप्रिल) रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील विजेवर चालणार प्रकाशदिवे बंद करून मेणबत्ती, दिवे, मोबाईलची टॉर्च किंवा फ्लॅश लावायला सांगितले असताना अनेकजण रस्त्यावर झुंडीने उतरले, फटाके वाजवले हे अशोभनीय वर्तन असून यापुढे तरी सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे आपल्या जीवाची पर्वा नकरता कोरोनाग्रस्तानच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. मात्र कोरोनाग्रसत्तांच्या संपर्कात आल्याने त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग दिसू लागला आहे, ही बाब चिंताजनक आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत यशस्वी होण्यासाठी घरात थाबनणे, आणि लक्षण आढळून आल्यास त्वरित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधने हाच प्रभावी मार्ग असल्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. कोरोनाच्या लढाईत आपण सर्व एक आहोत ही बाब कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला यश मिळवून देईल असा विश्वासही पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.