राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा बसणार फटका !



मुंबईसह राज्यात विश्रांती घेतलेला अवकाळी पाऊस (Rain in Maharashtra) पुन्हा एकदा आगमन करण्याच्या तयारीत आहे. अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Low pressure area) राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे.
त्यामुळे 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विविध जिल्ह्यांना इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने मंगळवारी (30 नोव्हेंबर) मुंबईसह, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
त्यानंतर 1 आणि 2 डिसेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. या दोन्ही दिवशी हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आधीच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना, अस्मानी संकटानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. याव्यतिरिक्त उद्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद आणि अहमदनगर या चौदा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे. हवामान खात्याने संबंधित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.