▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

महाराष्ट्र राज्याचे ‘राज्य-सर्प’ घोषीत करा - बंडू धोतरे



राज्याचे प्रतीक राज्य-प्राणी, पक्षी, वृक्ष, फुल व फुलपाखरू याप्रमाणेच महाराष्ट्र राज्याचे ‘राज्य-सर्प’ सुध्दा घोषीत करण्याची मागणी बंडू धोतरे यांनी राज्याचे वनमंत्री व प्रधान मुख्य वनसंरक्षक यांचेकडे एका निवेदनातून केली आहे.

महाराष्ट्र राज्य वन-वन्यप्राणी संरक्षण व संवर्धनाच्या कार्यात अग्रेसर आहे. राज्यात 49 अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प 5, राष्ट्रीय उदयाने 6, संवर्धन राखीव क्षेत्र 6 अशी संरक्षीत क्षेत्रे घोषीत केलेली आहेत. त्यासोबतच राज्य प्राणी, राज्य पक्षी, राज्य वृक्ष, राज्य फुल, राज्य फुलपाखरू सुध्दा घोषीत केलेले आहेत. यासोबतच निसर्गात ‘साप’ सुध्दा एक महत्वाचा घटक आहे, शहरी आणि ग्रामीण भागात सापासोबत मानवाचा नेहमीच संपर्क येतो, ज्यांच्या बदद्ल भिती, श्रध्दा-अंधश्रध्दा, दैवत्व, रूढी पंरपरा आदी जुडलेल्या आहेत, असा जिव म्हणजे ‘सर्प’.

वन्यजीव कायद्या अंतर्गत प्रत्येक सापास संरक्षण
वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत वन्यप्राणी, पक्षी सोबतच सांपाना सुध्दा संरक्षण दिले गेले आहे. सापांचे अन्नसाखळीतील तसेच निसर्गातील महत्व स्पष्ट केले आहे. भारतीय अजगर, भारतीय अंडीखाऊ साप यासारखी वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत अनुसुची क्रमांक 1 मधे समावेश आहे, म्हणजेच अनुसुची क्रमांक 1 मध्ये असणारे संकटग्रस्त अनेक वन्यप्राण्या इतकेच सांपाना सुध्दा महत्व आहे. तसेच अन्य सर्वच प्रजातीचे सापांना या कायदया अंतर्गत वेगवेगळया अनुसुचीत संरक्षण देण्यात आलेले आहे.
पर्यावरणातील महत्वाचा घटक
जगात आढळणाऱ्या 2900 प्रजातीच्या सापांपैकी जवळपास 270 साप हे भारतात आढळतात. पृथ्वीतलावरील सर्वात आधी पासुन असलेला साप हा एक प्राणी आहे. निसर्गाच्या परिसंस्थेच्या अनुषंगाने अन्नसाखळीच्या मध्यम फळीतील भक्षक असल्याने या सापांचा नाश झाल्यास सर्पाचे भक्ष्य असलेले जिवांची भरमसाठ वाढ होईल तर, साप ज्यांचे खादय आहे त्यांच्यात संघर्ष निर्माण होईल. म्हणुन अन्नसाखळीतील सर्वच जिव महत्वाचे आहेत. सर्प नैसर्गिक किटक नियत्रकांचे कार्य करीत असतात.

विषारी साप आणि सर्पदंश
भारतात आढळणाऱ्या प्रमुख विषारी साप नाग, मण्यार, घोणस व फुरसे हे चार साप आहेत. दरवर्षी भारतात सरासरी 46,000 लोक सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. जागतीक स्तरावर 19 सप्टेंबर हा दिवस ‘जागतीक सर्पदंश जनजागृती दिवस’ म्हणुन साजरा केला जातो, कारण जगभरात सर्पदंश होउन मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यात सुध्दा मोठया प्रमाणात सर्पदंश होउन मरणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

साप-सर्पविष तस्करी आणि अंधश्रद्धा
सर्पविष, सापांची कातडी तसेच गुप्तधन आदी अधंश्रध्दा म्हणुन सुध्दा तस्करी सुध्दा केली जाते. खरे तर प्रत्येक साप पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे, अनेकदा अंधश्रध्दा व भितीमुळे या सापांना मारले जाते. एकीकडे भारतात ‘नागपंचमी’ सारखा सण मोठया उत्साहाने साजरा केला जातो, हा सणच मुळात सापाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्याचा अधिवासाचा संरक्षण करण्याचा, सापाकडुन होणारे मृत्यु म्हणजे त्याचा प्रती असलेली भिती, आपल्या ग्रंथ पुराणातील सापांचे महत्व, निसर्गातील सापाचे महत्व विषद करणारा आहे, देशात वेगवेगळया भागात असलेल्या अनेक रूढी-पंरपरा सापाशी जुडलेल्या आहेत.

राज्यातील सर्परक्षण चळवळ
महत्वाचे म्हणजे सर्प संरक्षणाची मोठी चळवळ राज्यात सुरू आहे, सर्पमित्र-सर्परक्षक मोठया प्रमाणात गाव-खेडयात, शहरात मानवी वस्तीत साप निघाल्यानंतर त्यास सुरक्षीत पकडुन वनविभागाच्या मदतीने निसर्गमुक्त करण्याचे कार्य करीत असतात. शास्त्रीयदृष्टया विचार केल्यास राज्यात सुध्दा अनेक दुर्मीळ सापाचा अधिवास आहे. वनक्षेत्रापासुन ते मानवी अधिवासा पर्यत सर्वत्र सापांचा अधिवास दिसुन येतो. सर्पसंरक्षण चळवळीमुळे वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्य करणारे अनेक कार्यकर्ते घडलेले आहेत.

राज्य वनविभाग कडून अपेक्षा

राज्यात सांपाबाबत व्यापक जनजागृती व संवर्धनासाठी प्रत्येकांचे सहकार्य अपेक्षीत असल्याने वनविभागांने पृढाकार घेण्याची गरज आहे. त्यामुळे प्राणी, पक्षी व फुलपाखरू प्रमाणेच ‘राज्यसर्प’ सुध्दा असावे. त्याकरिता वनविभागास सुचित करून याबाबत योग्य माहीती घेऊन प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देण्याची वनमंत्री यांचेकडे विनंती केली आहे. असे झाल्यास ‘राज्यसर्प’ घोषीत करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल. त्यासोबतच वन्यप्राणी व सर्पसंरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात वनविभागाच्या पुढाकाराने आणखी भर पडेल. पर्यावरण व निसर्गसंवर्धनाच्या लढयात एक मैलाचा दगड गाठता येईल. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा नेहमी संपर्क येणारा वन्यजीव साप असून याविषयी भीति दूर होउन आस्था निर्माण होण्याची गरज आहे.

कोणता ‘साप’ असेल 'राज्यसर्प':

याकरिता वनअधिकारी, सापावर कार्य करणारे तज्ञ व अशासकीय सदस्यांची एक समीती तयार करून किंवा त्यांचेअभिप्राय घेउन कोणता साप ‘राज्यसर्प’ म्हणुन घोषीत करावा यावर निर्णय घेता येईल. महाराष्ट्रात वेगवेगळ्या अधिवासात अनेक प्रकारची विषारी-बिनविषारी तसेच दुर्मिळ-अतिदुर्मिळ तसेच संकटग्रस्त साप आहेत त्यांना संरक्षण आणि नागरिकामधे व्यापक जनजागृती होणे आवशयक आहे. शहरी व ग्रामीण भागात व्यापक जनजागृती कार्यक्रम कसा असेल यावर प्रस्ताव तयार करता येईल.