राखी पोहोचविण्यासाठी डाक विभाग सज्ज !


कोरोना काळात राखी टपालासाठी खास वितरण व्यवस्था !
चंद्रपूर,दि.31 जुलै : राखी म्हणजेच रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा व भावनिक उत्सव आहे. दरवर्षी रक्षा बंधनासाठीच्या राखी टपाल हाताळण्यासाठी डाक विभाग विशेष काळजी घेतो. यावर्षी देखील राखी टपाल महाराष्ट्रातील डाक कार्यालयाद्वारे मोठ्या प्रमाणात पाठवले जातील, अशी अपेक्षा डाक विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी राखी पोहोचविण्यासाठी डाक विभाग सज्ज असणार आहे.

राखी टपाल बुकिंग प्रक्रिया आणि वितरणाची विशेष व्यवस्था महाराष्ट्रातील सर्व डाक घरांतून करण्यात आली आहे. राखी टपालाच्या वेगवान प्रक्रियेसाठी राखी टपाल सेंटर मुंबई व नवी मुंबई येथेही सुरू करण्यात आले आहेत.

यावर्षी हा सण अधिक महत्वाचा आहे, कारण शहरात राहणाऱ्या भावंडांना विविध निर्बंधांमुळे या सणासाठी भेट घेणे शक्य होणार नाही. कदाचित त्यांचे भाऊ-बहिणी कंटेनमेंट झोन किंवा प्रतीबंधीत इमारतींमध्ये रहात असतील. या कोविड काळात, पोस्ट विभागाने राखी टपालाचे संकलन, प्रसार आणि वितरण यास सर्वात जास्त प्राधान्य दिले आहे. स्पीडपोस्ट राखीच्या वितरणामुळे या कठीण काळात लोकांच्या जीवनात आनंद होईल अशा घोषणेद्वारे आनंद मिळविण्याची विभागाची इच्छा आहे.

राखीचा सण 3 ऑगस्टला असल्यामुळे, महाराष्ट्र पोस्टल सर्कलने 2 ऑगस्ट रविवारी सर्व वितरण पोस्ट कार्यालयांमध्ये राखी टपालाची विशेष वितरण व्यवस्था केली आहे. प्राधान्यक्रमाने व वेळेत राखी पोचविण्यासाठी सर्वांनी लोक स्पीड पोस्ट सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.