गडचांदूरात गांधीजी जयंती दिनी बनावट तंबाखू विरोधात ढोके गुरुजींचे आंदोलन




चंद्रपूर (प्रति.)
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदी असलेला सुगंधित तंबाखूची आज खुले आम विक्री होत आहे. बनावट तंबाखूमुळे शौकीनांचे व नवतरूण युवकांच्या आरोग्याला धोक्यात टाकण्यात येत आहे. परंतु या व्यवसायाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचांदूर शहरामध्ये आशुतोष ढोके या शिक्षकाने या विरोधात एल्गार पुकारला असून नवतरूण शैक्षणिक क्षेत्रातील युवकांना यापासुन आरोग्याच्या धोका संभवत असुन कॅन्सर सारख्या आजाराचे रूग्ण गडचांदूर शहरात वाढत आहे, या गंभीर विषयावर ढोके गुरूजींनी यापूर्वी गडचांदूर पोलिस स्टेशन सोबतचं अन्य संबंधित विभागाकडे गडचांदूर शहरात बनावट तंबाखुची होत असलेली विक्री बंद व्हावी यासाठी तक्रारी केल्या आहेत, परंतु कोणत्याच विभागाने या गुरूजींच्या तक्रारीची दखल घेतली नाही अखेर १२ सप्टेंबर २०११ रोजी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे सदर गंभीर प्रकरणात दाद मिळावी अशी मागणी केली. मुनगंटीवार यांनी अन्न प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त आयुक्त यांचेकडे गडचांदूर शहरात बनावट तंबाखु विक्रीची दखल घेण्यात यावी, या आशयाचे पत्र दिले. परंतु संबंधित विभागाकडून अद्यापपावेतो गडचांदूर शहरातील बनावट तंबाखू विकणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. यासाठी आशुतोष ढोके गुरूजींनी २ ऑक्टोंबर गांधी जयंती निधी गडचांदूर शहरात तंबाखू बॅन' यासाठी बस स्टैंड ते पोलिस स्टेशन पर्यंत रॅली चे आयोजन केले असून या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसोबतचं विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. एखाद्या शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे यासाठी अशा घातक वस्तुंची निर्मीती करणारे व विक्री करण्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागत असेल तर कारवाई करण्याची जबाबदारी असणाऱ्या संबंधित भ्रष्ट विभागासाठी ही लाजेची बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार निर्बंध असणाऱ्या सुगंधित तंबाखुची विक्री करणारे गडचांदूर शहरामध्ये ४ मोठे व्यापारी आहेत. बनावट तंबाखूची विक्री याच दुकानातून होत असते व त्याची माहिती पोलिस विभागापासून साऱ्याच राजकारण्यांना आहे. मग विद्यार्थी व नवयुवकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या या व्यापाऱ्यांविरोधात साऱ्यांनीच पुढाकार घ्यायला हवा, परंतु शिक्षणाचे पवित्र कार्य करणारे ढोके गुरूजी यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना घेवून अशा प्रकारे रस्त्यावर उतरावे लागत असेल तर स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणान्यांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. ढोके सर ! आपले सोबत समाज उभा आहे, आपल्या या समाजहिताच्या कार्यात आमचा संपूर्ण सहभाग आहे. सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील मुख्य व्यापाऱ्याचा ३० वर्षापुर्वी गडचांदूर शहरात मोठा व्यवसाय होता. त्यावेळस सुगंधित तंबाखू बंद असलेल्या आत्ताचे तेलंगणा व त्यावेळसचे आंध्रप्रदेशामध्ये गडचांदुर शहरामधूनचं पुरवठा व्हायचा, तोच व्यापारी आज चंद्रपूर शहरातील सुगंधित तंबाखूचा आज मुख्य म्होरक्या असल्याची माहिती आहे.

गडचांदूरातील तक्रारी, आंदोलने फक्त कागदा पुरतेच!

पत्रकार या नात्याने मागील पाच वर्षापासून गडचांदूर शहरातील अनेक आंदोलने व तक्रारी बघण्यात आल्या आणि वृत्तपण लावण्यात आले. गडचांदूर शहराच्या सौंदर्यीकरणाचे प्रकरण असो, घनकचऱ्याचे प्रकरण असो, आदिवासींच्या जमिनी विक्री चे प्रकरण असो, पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे प्रकरण असो एक ना अनेक प्रकरणे पत्रकार आणि संपादक या नात्याने आम्ही बघितले आहे. आंदोलन या तक्रारींचे नंतर काय होते ते कळायला मार्ग नाही. गडचांदूर शहरामध्ये जोगी नगर चे प्रकरण मोठ्या स्तरावर वादग्रस्त सुरू आहे. या प्रकरणाचे काय होईल माहित नाही. यापूर्वी गडचांदूर शहरातील घनकचरा प्रकरणात मोठे आंदोलन करण्यात आले होते. विरोधी आणि तत्कालिन सत्ताधारी यांनी याविरोधात गळ्याची चिरफाड होईल एवढी आरडाओरड केली आंदोलन केले, नुकतेच त्याची चौकशी बसली आहे परंतु आंदोलन करणारे व आरडाओरड करणारे दोन्ही आता गप्प कां? हा शोधाचा विषय आहे. या शहरात आदिवासींच्या जमिनी अवैधरित्या विक्री करून अनेकांनी गलगट्ट पैसा कमावला आहे. सगळ्यात पूर्वी तर त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला हवी. सगळीच पैसा कमविण्यासाठी चाललेला उद्योग, लुटारू चे धंदे आणि धोरण मात्र समाजसेवेचे ! अशी स्थिती या ठिकाणी आहे. गडचांदूर शहरातील एक युवा नेता आपले बॅनर-पोस्टर लावून स्वतःला मोठा दाखवितो. महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारणी सोबत माझे संबंध आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याच संपत्तीची चौकशी करण्यात आल्यास अनेकांचे काळेभेरे याठिकाणी समोर येऊ शकते. सत्तेचा वापर चुकीच्या मार्गाने करून निव्वळ धन उगाळणाऱ्या गडचांदूरच्या ढोंगी समाजसेवकांचे पितळ आत्तातरी उघडे व्हायला हवे.
एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आरोग्याची हानी आहे यासाठी गडचांदूर शहरामध्ये निवेदन देत अआहे, आंदोलनाची भुमिका घेत असेल तर स्वतः:ला समाजसेवक म्हणणाऱ्या ढोंगी समाजसेवकांचा मुखडा हा जनतेसमोर यायलाच हवा. "पैशासाठी काहीबी" करणारे गडचांदूर शहरातील समाज सेवक आता उताणे पडायला हवे.