""ट्रोल" कर्त्यांनी विरोधासाठी केला फेसबुक वर "सुधिरभाऊं" चा विरोध!* मुनगंटीवार यांना "ट्रोल"कर्त्यांचे विघ्न!

"ट्रोल" कर्त्यांनी विरोधासाठी केला फेसबुक वर "भाऊं" चा विरोध!


चंद्रपूर : रविवार दि. 19 एप्रिल ला सायंकाळी पाच वाजता फेसबुक वरून "आपुलकीचा संवाद" साधण्यास आलेले राज्याचे माजी वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना ट्रोलकर्त्यांच्या विघ्नांचा सामना करावा लागला. प्रश्न निर्माण होतील, तरचं उत्तर मिळेल. आज समस्या मांडण्याचे साधनचं बंदिस्त झाले आहे. तक्रारी-निवेदन यातून प्रशासनाला जाब विचारायचा व दाद मागायचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे परंतु ज्याठिकाणी दाद मागायची, तेच प्रशासन आज "लाॅक" झाले आहे. सोशल मिडिया यासाठी प्रभावी माध्यम ठरले आहे. "ट्रोल" कत्यार्वरील अंधाधुंद वावर म्हणजे "दामिनी" चित्रपटांतील खलनायक अॅडव्होकेट चड्ढा (अमरिश पुरी) ला दामिनी (मिनाक्षी शेषांद्री) ने बलात्कारातील साक्षी पूराव्यादरम्यान खजिल करीत "प्रश्र्न विचारले गेले पण ते कोणत्या पद्धतीने?" यासारखी आहे. विरोधासाठीचं विरोध करायचा? अशा ट्रोलकर्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. अनेक बाबतीत ते दिसून ही येतात. १९ एप्रिल च्या मूनगंटीवार यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये दामिनी तील व्हिलेन सारखे ट्रोलकर्यांनी उधम माजविला होता. या ट्रोलकर्त्यांचा बोलविता धनी कोण? या चर्चेला आता पेव फूटले आहे.
आज सामान्यजणांचा बंदिस्त राहून "खाली दिमाग शैतान चे घर झाले" आहे. मार्ग काढणे, उपाय शोधणे हाच या समस्येवर योग्य पर्याय आहे. "शेजाऱ्यांशी आपुलकी" व "त्यांच्याशी संवाद" हाच शेजारधर्म "अडोस-पडोस" वाल्यांनी निभावला तरी ही आलेले "विघ्न" हातोहात दूर सारले जाऊ शकते, हीच सद्बुद्धी विघ्नहर्त्या श्रीगणेशाने विघ्नकर्त्यांना दिल्यास देशात सुख-शांती लाभण्यास अवधी लागणार नाही. स्थानिक स्तरावर होणारे फेसबुक लाईव्ह हे त्या-त्या क्षेत्रात प्रभावशाली ठरले आहे. प्रत्येक व्यक्ती हा अधिकाऱ्यांशी-प्रतिनींधीशी बोलू शकत नाही. फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला भेडसावणारा प्रश्न कुणीतरी शासन दरबारी पोहोचवावा हि भोळी आशा आज बंदीस्त असलेल्या गरिबाला समाधान देत आहे. "बंदिस्त" नसता तर "लाथ मारेल तेथून पाणी काढण्याची" क्षमता याच गरिबामध्ये आहे. ज्या प्रतिनीधीपर्यंत हा अनमोल मतदार पोहोचू शकत होता, तेही आज बंदिस्त झाले आहे हीच खरी शोकांतिका आहे. "अमका दिसत नाही, टमक्याला बघितलेच नाही" असे निवडून पाठविलेल्या प्रतिनीधींविषयींचे उद्गार आज हमखास कानावर पडत आहेत. Whatsapp व Facebook चे फेक अकाउंट म्हणजे आईसोलेशन-क्वारनटाईन झालेल्या "कोरोना"ग्रस्तांसारखे आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे ही फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनसंपर्कात असतात. सामान्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी यातून उलगडले आहे.


माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही जनसामान्यांचे प्रश्न मागवून त्याची उत्तरे देण्याची अभिनव संकल्पना फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राबविली. कधी, संवाद समस्या निवारणाचा तर कधी आपुलकीचा संवाद साधण्याचा त्यांचा प्रशंसनीय प्रयत्न असाच म्हणावा लागेल. सहाशे च्या जवळपास विविध भागातील प्रश्न यानिमित्ताने विचारले जाऊन त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न यातून होणार असल्याचे प्रारंभातच सांगण्यात आले. आपुलकीचा संवाद सुरू होताच स्मायलीच्या प्रतिक्रिया दिल्या जाऊ लागल्या. पहिल्यांदा हे प्रमाण कमी होते पण नंतर स्मायली आणि कमेंट च्या फैर्या सुरू झाल्या. विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे दोन माजी मंत्री, आमदार राम कदम यांना ही यापूर्वी ट्रोल करण्यात आले होते.

कोरोना च्या भयावह समस्येनंतर सारा देश lockdown झाला आहे. दिवसेंदिवस वाढणार्या lockdown मुळे जनसामान्यांची मानसिकता खालावत चालली असून सामान्यजणांपुढे समस्येचा डोंगर उभा राहत आहे, आणखी काही दिवस हीच परिस्थीती कायम राहिली तर त्याचे परिणाम भयावह असतील, बहुतेक याचीच कल्पना लोकनेत्यांना असावी म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेस चे शरदजी पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी जनतेशी फेसबुक लाईव्ह व अन्य मार्गाने संवाद साधला आहे. सरकार करत असलेल्या उपाय, योजना, समस्यावर निवारण व जनतेला संयमाचा संदेश या संवादातून साधला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशावर कोसळलेल्या संकटसमयी सगळ्यांनाच मिळून या परिस्थीतीचा सामना करायचा आहे, असे वारंवार आव्हान केले आहे. राजकारणासाठी अख्खे आयुष्य पडले आहे. या भयावह परिस्थितीमध्ये मतभेद-मनभेद विसरून सगळ्यांनी सोबत येऊन लढायचे आहे व कोरोनाची लढाई जिंकायची आहे असे बोलके व भावनिक आव्हानच राज्याच्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी केले आहे. जनसामान्यांच्या समस्या मोठे आहेत. कोरोना परिस्थीतीवर मात केल्यानंतर आणखी समोरची मोठी लढाई लढायची चिंता त्यांना आजपासून सतावत आहे. यानंतर मालक कामांवर ठेवेल कां? रेशन धान्य व्यतिरिक्त सरकारकडून काही मिळेल कां? विद्युत बिल माफ होईल कां? मुलांची फी माफ होईल कां? पुढील शैक्षणिक सत्रात मुलांना प्रवेश मिळेल काय? कुटुंबाची विस्कटलेली घडी सावरतांना होणाऱ्या प्रत्येक अडचणींची त्यांना आजपासूनच चिंता पडली आहे, आपल्यासमोर पडलेल्या या चिंतेचा चा मार्ग त्यांना पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, निवडून पाठविलेले लोकप्रतिनिधी यांच्या वार्तालापातून-संवादातून हूंदकाळायचा-शोधायचा आहे आणि याच कारणामुळे आजच्या स्थितीत न्यूज चॅनलचा TRP हा बाकी मनोरंजन चॅॅनेलपेक्षा वाढलेला आहे. राष्ट्रीय, प्रादेशिक स्तरावरचे प्रश्न वेगवेगळे आहेत. जिल्हा स्तरावरील प्रश्न सामान्यांसाठी महत्त्वाचे असतात. निवडून पाठविलेल्या लोकप्रतिनिधींनी त्या प्रश्नाचा उलगडा करावा, अशी रास्त अपेक्षा जनसामान्यांना आहे. रेशनकार्ड वर मिळणारे धान्य, घरी येणारे सिलेंडर, रोजच्या दैनंदिन वापरातील वस्तू याही आजच्या चिंतेचा विषय ठरले आहेत. संदेश, व्हाट्सअप संदेश, परिचित यांच्या माध्यमातून प्रशासन प्रतिनिधी यांच्यापर्यंत आपले प्रश्न समस्या पोहोचविण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना फेसबुक हे माध्यम वाटू लागले आहे.

नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी बांधकाम कामगार क्षेत्रातील कामगारांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकण्याचा प्रशंसनिय निर्णय घेतला. राज्यावर कोसळलेल्या या संकटात राज्याची आर्थिक घडी सत्ताधारी व विरोधकांचे आपसी सामंजस्यातूनचं लवकर मार्गी लागू शकेल, अर्थतज्ज्ञ व सामंजस राजकीय नियोजनातून यावर तोडगा लवकर निघू शकेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. सामान्यांच्या समस्या, प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळ्या समस्या, या जोपावेतो त्या-त्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी शासनासमोर मांडणार नाही, तोपावेतो त्या-त्या जिल्ह्यातील मूळ समस्या मार्गी लागणार नाही. देशावर कोसळलेले हे संकट यापूर्वी कोणत्याही राजनेत्याने, जननेत्याने यापुर्वी बघितलेले नाही. पहिल्यांदाच कोसळलेले हे संकट, पहिल्यांदाच नागरिकांवर येणारे समस्या, पहिल्यांदाच त्यावर करण्यात आलेल्या उपाय योजना या सर्व नव्यानेच देशात घडणार आहे.