आरआरबीटी व चोरबीटी कापूस बियाणे खरेदी करू नये: डॉ.उदय पाटील

आरआरबिटी,चोर बिटी

कापूस बियाणे खरेदी करू नये - डॉ. उदय पाटील


चंद्रपूर, दि.10 एप्रिल : जिल्हयामध्ये चोर बीटी या नावाने सर्वत्र परीचीत असलेल्या तथापि शासनाची मान्यता नसलेल्या अनधिकृत कापुस बियाण्याचा व्यवसाय काही खाजगी व्यक्ती कडुन मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती कृषि विभाग व प्रशासनास प्राप्त होत आहे. हे बियाणे ग्लॉयफोसेट या तणनाशकास प्रतिकारक्षम असल्यामुळे शेतकरी याकडे आकर्षित होतात. परंतु, त्याचे दिर्घ कालीन दुष्परिणाम आढळून आल्यामुळे शासनाने या बियाण्यास मान्यता दिलेली नाही, ग्लायफोसेट या तणनाशकाचा अनावश्यक वापर वाढवल्यामुळे जैवविविधतेस बाधा येत असुन जमीन आणि मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आआरबिटी,चोर बिटी कापूस बियाणे खरेदी करू नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.

शेतीमध्ये सततचा तणनाशकाचा वापर होत असल्याने कालांतराने त्या शेतीमध्ये कोणतेही पिक उगवणार नाही अशी शक्यता आहे. या चोर बीटी मध्ये गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करणा-या जिनची उपलब्धता आवश्यक असलेल्या विहीत टक्केवारी पेक्षा कमी असल्यामुळे हे वाण गुलाबी बोंड अळीस हमखास बळी पडते व त्याचा परीणाम इतर कापुस पिकावर होतो.

या बियाण्याची विक्री, साठवणूक अथवा खरेदी करण्यात येऊ नये या करीता कृषि विभाग व पोलीस विभाग यांचे संयुक्तपणे शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. इतःपर शेतक-यांनी या बियाण्याची पेरणी त्यांचे शेतावर केल्यास व पेरणी पश्चात कोणत्याही प्रकारची तक्रार केल्यास त्याची दखल घेण्यात येणार नाही.

या बियाणे उत्पादनास अधिकृत मान्यता नसल्याने सदरील बियाणे पुर्णपणे अनधिकृत रित्या उत्पादीत केले असुन सदर बियाणे बाळगणे, साठा करणे, विक्री करणे हे कापूस बियाणे अधिनियम 2009, बियाणे नियम 1966 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे तरतूदी नुसार कायदेशीर कारवाईस पात्र आहे. यामध्ये 5 वर्ष पर्यंत शिक्षा व 1 लाख रूपये दंडाची तरतुद आहे.

चंद्रपूर जिल्हयातील विशेषत: कापुस उत्पादक क्षेत्रातील शेतक-यांनी कोणत्याही प्रकारच्या खोट्या आमिषाला बळी पडुन, या अनधिकृत कापुस बियाण्याची आपले शेतामध्ये लागवड करण्यासाठी खरेदी करू नये. तसेच आपल्या आसपास कोणीही छुप्या पध्दतीने या बियाण्याचा व्यवसाय करीत असेल तर त्याची माहिती त्वरीत आपले नजीकचे कृषि कार्यालयास दयावी.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.